प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
केंडबे (ता. जावली) : केंडबे येथील शेतकरी बाजीराव मारुती ओंबळे यांच्या घराशेजारी ठेवलेल्या गंजीला अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे १५ हजार पेंढा आणि ५ हजार कडबा जळून खाक झाला.
ही घटना अचानक घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने सर्व कडबा भस्मसात झाला.
या आगीत अंदाजे १ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू असून, पीडित शेतकऱ्याला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

टिप्पणी पोस्ट करा