प्रतिनिधी | बजरंग चौधरी
मेढा : जावली तालुक्यातील बिभवी गावातील वसंत शंकर कदम यांचे घर गेल्या महिन्यात अचानक लागलेल्या आगीत पूर्णपणे भस्मसात झाले होते. या दुर्घटनेत अंगावरील कपड्यांखेरीज कुटुंबाकडे काहीही शिल्लक राहिले नव्हते. घर जळून खाक झाल्याने कदम कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले होते.
या कठीण प्रसंगी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. त्याचबरोबर वसंत कदम यांच्या शालेय जीवनातील वर्गमित्रांनीही आपले मैत्रीचे नाते जिवंत असल्याचे दाखवून दिले. करंजे गावचे सुपुत्र तुकाराम धनावडे (तात्या), शामराव जुनघरे, डी. एन. धनावडे, सर्जेराव मर्ढेकर आदी वर्गमित्रांनी एकत्र येत कदम कुटुंबाला ३१ हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.
मदत देताना बिभवी गावचे उपसरपंच कांताराम शिंदे, एकनाथ देशमुख (तात्या) यांच्यासह कदम यांचा मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकटाच्या काळात मैत्री, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपत दिलेली ही मदत परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment