मधमाशांनी हल्ला केला अन् मुलांच्या डोक्यावरुन 'बापा'चं छत्र हरपलं; पितापुत्रांसोबत दुर्दैवी घडलं

श्री.निलेश सुर्वे 
प्रतिनिधी / हिंगोली

हिंगोलीतील शेतकरी पितापुत्रासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी आपल्या शेतात सोंगणीला आलेलं हरभऱ्याचं पीक गोळा करताना अचानक आग्या मोहोळाच्या मधमाशांनी हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.


हिंगोली : हिंगोली सेनगाव तालुक्यातील जवळा (बु) या गावातील शेतकरी पितापुत्रासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी आपल्या शेतात सोंगणीला आलेलं हरभऱ्याचं पीक गोळा करताना अचानक आग्या मोहोळाच्या मधमाशांनी हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर मुलाची प्रकृती गंभीर आहे. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

शेतकरी भास्कर नाथराव खिल्लारे वय वर्ष (४३) हे व मुलगा धनंजय खिल्लारे सोबतच धम्मदीप खिल्लारे हे सकाळी दहा वाजता आपल्या शेतातील काढणी केलेले हरभरा पीक जमा करत असताना बाजूलाच असलेल्या झाडावरील मधमाशांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे ते सैरावैरा धावत होते. असंख्य मधमाशांनी हल्ला चढवल्याने काय करावं हे या तिघांनाही समजत नव्हते. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी ते आरडाओरडा करत होते. यात शेतकरी भास्कर खिल्लारे यांच्यावर असंख्य मधमाशा तुटून पडल्या होत्या. यामध्ये त्यांना वेदना असह्य झाल्या होत्या. घायाळ होऊन भास्कर खिल्लारे जमिनीवर कोसळले. त्यानंतर देखील मधमाशांचा मारा त्यांच्यावर सुरूच होता.

धावत असताना शेजारील शेतातील काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी हा प्रकार बघितला. मधमाशांच्या मोहोळाचा हल्ला झाल्याचे पाहून तातडीने शेतकऱ्यांनी आग पेटवली. धुरामुळे काहीशा मधमाशा दूर गेल्या त्यानंतर शेतकरी भास्कर यांना तातडीने हिंगोली येथे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुलगा धनंजय खिल्लारे व धम्मदीप यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. शेतकरी भास्कर खिल्लारे पार्थिवावर जड अंत:करणाने अंत्यविधी करण्यात आला आहे.


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / हिंगोली

Post a Comment

Previous Post Next Post