जावली तालुक्यातील जनतेने माझ्यावर भर भरून प्रेम केले आहे. या प्रेमामुळेच मला विक्रमी मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे जनतेला देताना मी कधीही हात आकडता घेणार नाही. बोंडारवाडी धरणासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला असून बाधितांचे योग्य समन्वयाने पुनर्वसन करत ५४ गावांचा पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली .
केळघर (जावली) : नांदगणे - केळघर ता. जावली येथे श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळावा उत्साहात झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ. सदाशिव सपकाळ, तहसिलदार हणमंत कोळेकर, इतिहासकार श्रीमंत कोकाटे, माजी सभापती बापूराव पार्टे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी सभापती भाऊसाहेब उभे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, कृती समितीचे आदिनाथ ओंबळे, विलासबाबा जवळ, युवा उद्योजक राजेंद्र धनावडे, आनंदराव जुनघरे, मोहनराव कासुर्डे, भाजपयुमोचे तालुकाध्यक्ष सागर धनावडे, आनंदराव सपकाळ, विजय शेलार, नारायण धनावडे, एकनाथ सपकाळ, ज्ञानेश्वर दळवी, हरिभाऊ शेलार, विजय सावले, विनोद शिंगटे, रामभाऊ शेलार, नारायण सुर्वे, जगन्नाथ जाधव, वैभव ओंबळे, जनार्दन मोरे, राजेंद्र जाधव, जगन्नाथ पार्टे, जितेंद्र कासुर्डे, अंकुश बेलोशे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या विभागातील जनतेच्या पाणी टंचाईचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी स्व. विजयराव मोकाशी साहेब यांनी बोंडारवाडी धरण कृती समितीच्या माध्यमातून उभ्या केलेल्या लढ्याला मुर्त स्वरूप येत आहे. ते आज जरी आपल्यात नसले तरी विचाराने ते कायम आपल्या सोबत असतील. त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी बोंडारवाडी धरणास माझा कायम पाठींबा असून बाधित होणाऱ्या गावांचे योग्य पुनर्वसन करून एक टीएमसी धरण होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. ऐतिहासिक जावलीचे छत्रपती घराण्याशी असणारे ऋणानुबंध आजही कायम असून मला मिळालेले मताधिक्य हे माझ्या कामाची पोहचपावती आहे. मी कायम जनतेच्या रुनामध्ये राहत काम करणार आहे.
यावेळी इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी इतिहासातील शिवाजी महाराजांचा दाखला देत शिवेंद्रसिंहराजेंनी तो वारसा जपला असून ते दिलेला शब्द नेहमी पाळतात असे सांगितले. त्यांचे तत्वनिष्ठ व्यक्तीमत्व महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. त्यांच्या माध्यमातून याविभागातील जनतेचे प्रश्न कायम स्वरूपी सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सध्या कोयना धरणातर्गंत असणाऱ्या तापोळा विभागातील सोळशी नदीवर धरण बांधण्यासाठी सर्व्हे सुरु असून याचे पाणी भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून जावली तालुक्यातील बामणोली विभागापर्यंत कॅनॉल व्हावा तसेच केळघर विभागातील काही गावांना बोगद्याव्दारे पाणी मिळावे अशी मागणी केली आहे. याचा बोंडारवाडी धरणावर कोणताही परिणाम होणार नाही. तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी म्हणाले, या परिसरातील जनता पाण्याअभावी रोजीरोटीसाठी विस्थापित होत आहे. हे थांबविण्यासाठी बोंडारवाडी धरण होणे ही काळाची गरज आहे आणि ना. शिवेंद्रसिंहराजे हेच फक्त हे काम करू शकतात.
यावेळी माजी आ. सपकाळ, एकनाथ सपकाळ, विलासबाबा जवळ, वैभव ओंबळे, राजेंद्र जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. आदिनाथ आंबळे यांनी प्रस्ताविक केले . अशोक लकडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीरंग बैलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास केळघर, मेढा, कुसुंबी परिसरातील ५४ गावातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, मुंबई - पुणे स्थित युवक उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / जावली






Post a Comment